
सामाजिक वनीकरणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; नागझरी येथे वृक्षभेट कार्यक्रम रविवारी
पालघर, प्रतिनिधी :
पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कुणबी समाजाचे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर तालुका पूर्व विभाग यांच्या वतीने रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी नागझरी येथे सामाजिक वनीकरण व वृक्षभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा उपक्रम स्व. ॲड. अमृत पांडुरंग अधिकारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येत असून समाजातील विविध घटकांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती केली जाणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता स्व. ॲड. अमृत पांडुरंग अधिकारी स्मरणार्थ सामाजिक वनीकरण व वृक्षभेट कार्यक्रमाच्या नामकरण सोहळ्याने होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता सामाजिक वनीकरण आणि वृक्षभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
काटाळे गटातील रोहिणी बँक्वेट सभागृह, नागझरी येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार असून पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि हरित भविष्यासाठी समाजाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
कार्यक्रमास समाजातील आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, समाजबांधव तसेच महिला-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर तालुका पूर्व विभागाचे अध्यक्ष, सचिव व कार्यकारिणी यांनी केले आहे.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या विचाराला अनुसरून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी समाजाने स्वीकारावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.